◆◆◆ शुभ दिपावली ◆◆◆


◆◆ वसुबारस ◆◆
~~~~~●●●~~~~~
दि. १६/१०/२०१७ सोमवार
(१) ■ वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
(२) ■ या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.....

◆◆ धनोत्रयोदशीच्या ◆◆
~~~~~~~●●●●~~~~~~
दि. १७/१०/२०१७ मंगळवार
धनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. हा दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते.
            ●● धनत्रयोदशी दंतकथा ●●
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दीव्यानी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लाउन त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.
तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असे ही म्हणतात.

◆◆ नरक चतुर्दशी ◆◆
   ■ ● दिपावली ● ■
दि. १८/१०/२०१७ बुधवार अमाववास्या
आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण
साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी
अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी
पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन
करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर
होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. हा मुख्य
दिवाळीचा पहिला दिवस.
            ◆◆ अभ्यंग स्नान विधी: ◆◆
ह्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान
करायचे.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी
साबण वापरतात.त्यावेळी खालील मंत्र म्हणावा.
  'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।'
      ●● नरक चतुर्दशीची पौराणिक कथा : ●●
पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर
या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता.
देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला.
हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने
जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना
कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह
करण्याचा बेत केला.
   त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला.
श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने
नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार
करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना
नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या
तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा
होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे
आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली
जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी
अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे
नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा
कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला
आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त
केला. श्रीकृष्णानी अत्याचारीनरकासुराचा वध करून
त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची
मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाश आणि मुक्ताचा
आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे
कारण आहे.या दिवशी पहाटेच पणत्या लावतात.
सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या
लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी
करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

◆◆◆ लक्ष्मीकुबेर पूजन ◆◆◆
~~~~~●●●💝💝●●●~~~~~
दि. १९/१०/२०१७ गुरुवार
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात.शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक
ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून
आनंद साजरा केला जातो.
  प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची
रित होती. कुबेर हा शिवाचा खजीनदार आणि
धनसंपत्तीचा  स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन
करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला
निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतिक
कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच
लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती
सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र
दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी
इरिति सह दाखविला आहे. यावरून असे दिसते
की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिति
यांची पूजा केली जात असावी. .कालांतराने इरितीचे
स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी
गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

◆◆◆ बलिप्रतिपदा पाडवा ◆◆◆
~~~~~~~●●●●●●~~~~~~~~
दि. २०/१०/२०१७ शुक्रवार
बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला
पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा
करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल
होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे
कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय.

      ■ बलिप्रतिपदेची पौराणिक कथा ■
बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा
अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान
देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच
असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा
निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत
सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ
नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते
मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलीराजा
कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा
भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार
(वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन्
तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे
म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा
मागितल्यावर त्याने विचारले,
‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान
मागितले. ‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय
होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी
वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप
धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली.
दुसर्या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने
‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास
विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरा पाय
माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय
त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात
घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर
मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे
त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता
पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि
आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन
पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी
तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे.
प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्याला यमयातना
होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या
घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते तीन दिवस
म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या
आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे
म्हणतात.
   पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला
एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले
जातात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र
काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा
टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. शेतकरी
पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका
मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात
व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.
काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची
पूजा केली जाते. असा हा लोककल्याणकारी राजा
बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी
विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन
मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या
दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही
नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या
वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ
करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या
कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू
होतोत. कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू
करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता
वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती
रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती
पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची
पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात.
ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी
जावयास आहेर करतात.

◆◆◆ भाऊबीज यमद्वितीया ◆◆◆
~~~~~💝💝●●●💝💝~~~~~
दि. २१/१०/२०१७ शनिवार
   या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या
भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला
बोलावले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी
जेवायला गेलाअशी पौराणिक कथा आहे. म्हणून
भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
   हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील
द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता
दाखवणारा आहे. तेव्हा `बीजेच्या कोरीप्रमाणे
बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका
आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे
सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते;
म्हणून त्याकरिता हा भाऊबीजेच्या सण आहे. बंधु-
भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी
बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि
सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम
चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग
ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा
सत्कार करतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी
भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून
ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण
ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे
यासाठी हा सण साजरा करतात.

      दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी
                 स्वप्न साकार व्हावी
      ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल
                    आठवण ठरावी…
      आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
              अधिकाधिक सुंदर व्हावं…
            दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!!

           दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!
                  ●● वसुबारस ●●
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !

                 ●● धनत्रयोदशी ●●
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

                ●● नरकचतुर्दशी ●●
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

                 ●● लक्ष्मिपुजन ●●
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !

         ●● पाडवा अर्थात बलिप्रतिपदा ●●
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा
यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

               ●●● भाऊबीज ●●●
जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी