संत सवतामाळी महाराज पुण्यतिथी २०१७
सावता माळी (जन्म: इ.स. १२५० समाधी १२९५ नामदेवाच्या प्रभावळीत महत्वपूर्ण मराठी संत सावता माळी या नावातच त्यांची व्यवसायबद्ध असलेली जात लक्षात येते. ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता माळी यांचे वडील परसूबा व आई नांगिताबाई यांच्या पोटी झाला. आई व वडील दोघेही विठ्ठल भक्त होते. सावता हा नवसाचा मुलगा पंढरपूरजवळच्या अरणभेंडी गावी त्यांचा जन्म झाला.सावताचे लग्न भेंडे गावातील रुपा माळी भानवसे या कन्येशी झाला. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदि पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. महाराजांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून् ठेवत असे.
कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्र्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज आहेत. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो.
अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योगर्याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.
‘‘योगर्याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।। तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।’’
हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे.
अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणु या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.
सावता माळी यांचे अभंग कमी असले तरी त्याचा ठसा जनमानसावर उमटलेला दिसून येतो. काही अभंगातून त्याने तत्कालीन सामाजिक संदर्भाचेही दर्शन घडविले आहे. सावता माळी यांच्या अभंगात सोपेपणा, प्रासादिकता, व अल्पाक्षरत्व आढळते. सावताने आपले आध्यात्मिक अनुभव प्रकट करतांना व्यवसायनिष्ट प्रतिमांचा वापर केला आहे.
कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी ||लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||
विठ्ठल केवळ मूर्तीमधेच नाही, देवळात नाही, तर तो सर्वत्र व्यापक आहे. सावता आपल्या शेतात उगवलेल्या चैतन्य कोंभात विठ्ठलाचे गोंडस रूप पाहतो. ‘सावताने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा’ असे शेवटी म्हणतात.
‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा